मुंबई : अटकेत असलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना न्यायालयात पुन्हा एकदा झटका बसला आहे. राणा दाम्पत्याला मुंबई सेशन्स कोर्टातही तातडीचा दिलासा मिळालेला नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या खासगी निवासस्थानात हनुमान चालीसा पठण करण्याच्या घोषणेनंतर नवनीत राणा आणि रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली. त्यानंतर जामीन मिळावा यासाठी राणा दाम्पत्याने शिवडी येथील विशेष कोर्टात जामीन अर्ज केला. हा अर्ज प्रलंबित असताना आणि त्यावर २९ एप्रिलला सुनावणी असतानाही त्यांनी सेशन्स कोर्टात जामीन अर्ज केला होता. मात्र, त्यांना दिलासा मिळालेला नाही. या प्रकरणात राज्य सरकारला उत्तर देण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी दिला आहे, त्यामुळे जामीन अर्जावर आता २९ एप्रिल रोजी सुनावणी होईल.
राणा दाम्पत्याविरोधात पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम १५३-अ खाली दोन समुदायांत तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवला होता. तसंच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याच्या आरोप आहे. त्यानंतर राजद्रोहाचे १२४-अ कलमही लावल्यामुळे राणा दाम्पत्याच्या अडचणी वाढल्या आहेत.




