अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधून 168 लोकांना घेऊन हवाई दलाचे विमान गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर पोहोचले आहे. यापैकी 107 भारतीय आहेत. यापूर्वी काबूलमधून बाहेर काढलेले इतर 87 भारतीय आज सकाळी एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीला पोहोचले होते. यामध्ये 2 नेपाळींचा समावेश आहे. हे लोक 2 विमानांनी भारतात पोहोचले आहेत. त्यांना यापूर्वी ताजिकिस्तानची राजधानी दुशांबे आणि कतारची राजधानी दोहा येथे पाठवण्यात आले होते. तेथून त्यांना काल रात्री भारतात पाठवण्यात आले. त्याचवेळी, भारतीय हवाई दलाच्या आणखी एका विमानाने आज काबूलमधून उड्डाण केले आहे.
काबूलमधून भारतीयांना बाहेर काढण्याचे काम सुरूच आहे. यामध्ये अफगाणिस्तानच्या खासदार अनारकली होनरयार, नरेंद्र सिंह खालसा आणि त्या दोघांच्या कुटुंबांचा समावेश आहे. ते काबूल विमानतळावर आहेत आणि आज त्यांना भारतात आणले जाऊ शकते. काबुलहून येणाऱ्या पुढील विमानात 23 अफगाणी हिंदू आणि शीख यांचा समावेश असेल. इंडियन वर्ल्ड फोरमचे अध्यक्ष पुनीत सिंह चांधोक यांनी ही माहिती दिली आहे. तालिबान्यांनी शनिवारी ज्यांना सोबत घेतले त्यांच्यामध्ये होनयार आणि खालसा यांचा समावेश आहे. तालिबानने म्हटले होते की ते अफगाणी आहेत, त्यामुळे ते देश सोडू शकत नाहीत. मात्र, नंतर त्यांना सोडून देण्यात आले.
अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या परतीचा मार्ग सुकर झाला आहे. काबूल विमानतळावरून भारताला दररोज दोन विमाने संचालित करण्याची परवानगी मिळाली आहे. अमेरिकन आणि नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) सैन्याने शनिवारी यासाठी परवानगी दिली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की आता ते लवकरच सर्व भारतीयांना परत आणतील. सध्या 300 भारतीय अडकल्याची माहिती आहे.




