जळगाव : ट्रीपलसीट जाणाऱ्या दुचाकीस्वारांना भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात दुचाकीवरील तिनही तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात असलेल्या फुलगाव फाट्याजवळील उड्डाणपुलाजवळ आज (२५ मे) दुपारी घडली. या अपघातात विवेक सुनील पाटील (वय १७), देवानंद सोपान पाटील (वय १६) आणि तुषार राजेंद्र पाटील (वय १७) या तिन्ही अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला आहे.
भुसावळ तालुक्यातील तळवेल येथील रहिवासी असलेले विवेक, देवानंद आणि तुषार हे तिघे मित्र आज सकाळी कामानिमित्त भुसावळ येथे आले होते. काम आटोपल्यानंतर ते दुचाकीने घरी परतत असताना फुलगाव फाट्याजवळ असलेल्या उड्डाणपुलावर त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने धडक दिली. या जोरदार धडकेमुळे हे तिघे दुचाकीवरून रस्त्यावर फेकले गेले. यात तिघांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. विवेकचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. तर देवानंद आणि तुषार या दोघांना तात्काळ गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. परंतु, या दोघांचा देखील रुग्णालयात उपचार सुरु करण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे तळवेल गावावर शोककळा पसरली आहे.




