पुणे : देहूतल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलू न देणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. देहूमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात बोलले. मात्र, अजित पवारांना बोलण्याची संधी मिळाली नाही. हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
देहू येथील पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी (@narendramodi) यांच्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(@Dev_Fadnavis) यांना बोलण्याची संधी दिली.परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार (@AjitPawarSpeaks)यांना बोलू दिले नाही.हा महाराष्ट्राचा अपमान आहे
— Supriya Sule (@supriya_sule) June 14, 2022
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. ज्या जिल्ह्यात पंतप्रधान जातात तेथील पालकमंत्र्याला त्यांच्यासोबत राहावे लागते तो या देशाचा प्रोटोकॉल आहे. त्यामुळे अजित दादांचे हे कर्तव्य आहे. पण त्या कार्यक्रमात अजित दादांना बोलू न देणे हे मला अयोग्य वाटले. अजित पवारांच्या कार्यालयाने पीएम ऑफिसला विनंती केली होती की, अजित पवारांना भाषण करायचे आहे. दादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने हा त्यांचा अधिकार आहे. मात्र, पीएम कार्यालयाने अजित दादांच्या भाषणाला परवागणी दिली नाही, हे गंभीर असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
देहू संस्थानकडून संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जेव्हा फडणवीसांचे भाषण झाले, त्यानंतर सुत्रसंचालन करणाऱ्या व्यक्तीने थेट पंतप्रधान मोदींना भाषण करण्यासाठी सांगितले. त्यामुळे अजित पवारांना भाषण करता आले नाही. यावेळी मोदींनी ‘अजितदादांना बोलू द्या’, असा इशारा केला. पण अजितदादांनी ‘तुम्ही बोला’ म्हणत मोदींना खुणावलं. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाने थेट मोदींचं नाव घेतल्याने ते भाषणासाठी डायसकडे गेले.
पंतप्रधान मोदी यांनी माफी मागावी – अमोल मिटकरी
प्रधानमंत्री हे पद संवैधानिक आहे, त्या प्रोटोकॉलनुसार स्थानिक पालकमंत्री म्हणजे अजित पवारांना त्यांच्या स्वागतासाठी जाणे अपेक्षित आहे आणि ते गेले देखील. मात्र, असे असताना त्या प्रोटोकॉलमध्ये संवैधानिक पदावर मोदी आणि अजित पवार देखील आहेत. अजित पवारांना जर जाणिवपूर्वक डावलले असेल तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे. हा संविधानिक पदाचा अपमान आहे, मोदीजी चूक दुरुस्त करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. धार्मिक ठिकाणी जर राजकारण करत असाल तर वारकरी सांप्रदाय व महाराष्ट्रातील जनता हे कधीच खपवुन घेणार नाही, असेही ते म्हणाले.
वारकर्यांच्या आनंदात मिठाचा खडा टाकू नका – प्रवीण दरेकर
प्रवीण दरेकर म्हणाले कि, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या शिळामंदिराचे लोकार्पण करून महाराष्ट्राचा, वारकरी परंपरेचा गौरव केला असताना काहींच्या पोटात दुखण्याचे कारण काय? वारकर्यांचा सन्मान झाला, म्हणून महाराष्ट्राच्या अपमानाचा कांगावा कशाला? राष्ट्रवादी काँग्रेसला लाज वाटली पाहिजे. भाषणे कुणाची व्हावीत आणि कुणाची नाहीत, यापेक्षा आमच्यासाठी वारकर्यांचा सन्मान अधिक महत्त्वाचा आहे. तो होतोय, याचा अधिक आनंद आहे. वारकर्यांच्या आनंदात मिठाचा खडा टाकू नका, ही माझी विनंती आहे.”
राष्ट्रवादी काँग्रेसला लाज वाटली पाहिजे.
भाषणे कुणाची व्हावीत आणि कुणाची नाहीत, यापेक्षा आमच्यासाठी वारकर्यांचा सन्मान अधिक महत्त्वाचा आहे. तो होतोय, याचा अधिक आनंद आहे. वारकर्यांच्या आनंदात मिठाचा खडा टाकू नका, ही माझी विनंती आहे. (2/2)@NCPspeaks#Maharashtra— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) June 14, 2022




