चंद्रपूर : पिकांची देखरेख ठेवण्यासाठी मचाणीवर चढलेल्या भीमा घोगलोत नावाच्या शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. बिबट्याने थेट मचाण गाठली. शेतकऱ्यावर हल्ला केला. त्याला लांब फरफटत नेले. ओरडण्याचा आवाजाने इतर शेतकऱ्यांनी धाव घेतली. या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील या घटनेने शेतकरी हादरले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, राजुरा तालुक्यातील थोमापूर येथील भीमा घोगलोत नेहमीप्रमाणे शेतात पीक संरक्षणासाठी जागलीला गेले होते. शेतातील मचाणीवर बसून ते जागल करीत होते. अशात बिबट्याने थेट मचाण गाठली. शेतकऱ्यावर हल्ला केला. त्याला लांब फरफटत नेले. ओरडण्याचा आवाजाने इतर शेतकऱ्यांनी धाव घेतली. त्यानंतर जे दृश्य दिसलं त्यामुळे शेतकरी हादरले आहेत.
बिबट शेतकऱ्यास ओढून नेत होता आणि शेजारी शेतकरी मात्र काही करू शकले नाहीत. या हल्ल्यात शेतकरी भीमा यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती वनकर्मचाऱ्यांना देण्यात आली. सुब्बई, चिंचोली, अंतरगावचे वनरक्षक आणि इतर वनकर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी पंचनामा केला. या घटनेने जागल करणारे शेतकरी धास्तावले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात वाघ मानव संघर्षाने टोक गाठले आहे. वन्यजीवांच्या हल्ल्यात रोजचे बळी चालले आहेत. वन्यजीव मानव संघर्ष टाळण्यासाठी आता प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.




