मुंबई : राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी बलात्कार करणाऱ्यांची तुलना भटक्या कुत्र्यांशी करत त्यांचे नपुंसकीकरण करायला हवे असे वक्तव्य केले. त्यांनी हे विधान भरतपूर बार असोसिएशनच्या शपथविधी समारंभात न्यायिक अधिकारी, वकील आणि इतर मान्यवरांना संबोधित करताना केले.
राज्यपाल बागडे यांनी महाराष्ट्रातील एक उदाहरण देत म्हटले कि, जिथे एका स्थानिक नागरी संस्थेने भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांचे नपुंसकीकरण करून त्यांची संख्या कमी केली. ते म्हणाले, जसे भटक्या कुत्र्यांना नपुंसक करून त्यांची संख्या कमी केली जाते, तसेच बलात्कार करणाऱ्यांसोबत असं करायला हवं. यामुळे समाजावर एक सकारात्मक परिणाम होईल. या निर्णयामुळे समाजात एक कठोर संदेश जाईल. जेव्हा एक बलात्कार करणारी व्यक्ती गावात फिरते, तेव्हा लोकांनी त्याला ओळखून म्हणायला हवं कि, ‘अरे, हा तोच आहे!’ यामुळे अशा लोकांना समाजात वावरता येणार नाही आणि त्यामुळे गुन्हे कमी होण्याची शक्यता आहे.
राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी चित्रीकरणाच्या मुद्द्यावरही टीका केली. त्यांनी म्हटले की, “माझ्या असं लक्षात आलंय की काही वेळा महिलांचा छळ होत असताना लोक व्हिडिओ रेकॉर्ड करत बसतात, पण त्यांनी मदतीसाठी पुढे यायला हवं. चित्रीकरण करण्याऐवजी त्यांनी त्या वेळेस त्वरित हस्तक्षेप करावा.” यावर त्यांनी समाजाला संदेश दिला की, जो अशा प्रकारचा गुन्हा करत आहे, त्याला पकडण्यासाठी प्रत्येकाने तयार असले पाहिजे. त्यांनी महिलांवरील गुन्ह्यांची गंभीरता सांगताना हेही लक्षात आणून दिले की, “जर समाजाने गुन्हेगारांना तोंड देऊन त्यांना शिक्षा देण्याची मानसिकता स्वीकारली, त्याच वेळी महिलांवरील गुन्हे कमी होऊ शकतात.”
इतिहासातील एक महत्त्वाचा संदर्भ देत, बागडे यांनी शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील एक घटना सांगितली. ते म्हणाले, “शिवाजी महाराजांच्या काळात बलात्काराचा आरोप असलेल्या गावप्रमुखाचे हात आणि पाय तोडण्यात आले होते. हे केल्यामुळे समाजात अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई केली जाऊ शकते.”
राज्यपालांचे हे विधान महिलांवरील हिंसाचाराच्या संदर्भात गहन चर्चा निर्माण करणारं ठरू शकतं. त्यांच्या या विधानावर समाजातील विविध गटांकडून मिश्र प्रतिक्रिया येण्याची देखील शक्यता आहे. यावर महिला कार्यकर्त्यांकडून काय प्रतिक्रिया असेल हे देखील महत्त्वाचे ठरेल.




