अकोला : कृषी विद्यापीठांमध्ये होणारे संशोधन हे शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर पोहोचवता यावे, यासाठी कृषी विद्यापीठांना दरवर्षी 50 कोटी रुपये विस्तार शिक्षणासाठी देण्यात येतील, असे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. ते म्हणाले की, कृषी विद्यापीठाला अमृत सरोवरच्या माध्यमातून पाणी उपलब्ध झाले आहे,तथापि, हे पाणी वापरता यावे यासाठी राज्यशासन निधी देईल.
शेतकऱ्यांनी उत्पादनाकडे लक्ष देतानाच आपले उत्पादन विक्री करण्याचे कौशल्यही आत्मसात करावे. त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी ‘विकेल ते पिकेल’ यावर भर दिला आहे. कृषी विद्यापीठांमध्ये मुलींचे प्रमाण 50 टक्क्यांहून अधिक आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. राज्य शासनाने कृषी योजनांचा लाभ देण्यासाठी महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी लक्ष्मी योजना सुरु केली आहे. अमृत सरोवरच्या माध्यमातून कृषी विद्यापीठ तसेच अन्य भागात जलसंधारणाचा लाभ होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.




