मुंबई : महाराष्ट्रात 2022 मध्ये आतापर्यंत किमान 25 जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे, जो सहा वर्षांतील सर्वाधिक असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून समोर आले आहे. याआधी 2016 मध्ये उष्माघाताने 19 जणांचा मृत्यू झाला होता.
1 मे 2022 पर्यंत उष्माघाताची एकूण 381 प्रकरणे आरोग्य विभागाकडे नोंदवण्यात आली आहेत. उष्माघातामुळे सर्वाधिक 11 मृत्यू नागपुरात, त्याखालोखाल औरंगाबादमध्ये 5 आणि नाशिकमध्ये 4 मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. नागपूर विभागात राज्यातील सर्वाधिक ३०० प्रकरणे आहेत.
दरम्यान, राज्याच्या काही भागात पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यांचा समावेश असलेल्या उत्तर मध्य महाराष्ट्रातील भागात ४ मे ते ६ मे दरम्यान उष्णतेची लाट जाणवेल. तर कोकण आणि गोवा परिसर, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती दिसणार नाही. तथापि, मराठवाड्यात उष्णतेची लाट येणार नसली तरी या प्रदेशातील कमाल तापमान जास्त म्हणजेच ४० अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक राहील. उत्तर मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याचे कारण म्हणजे वायव्य भारतातून येणाऱ्या उष्ण आणि कोरड्या लाटा आहेत.
वायव्य आणि मध्य भारतात पारा उच्च आणि सरासरी कमाल तापमान अनुक्रमे 35.9 आणि 37.78 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने काही आठवड्यांपासून देशातील अनेक भाग तीव्र उष्णतेच्या लाटेत त्रस्त आहेत.




