अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यामध्ये अतिशय भयंकर घटना घडली आहे. एका व्यक्तीने किरकोळ वादातून अगोदर पत्नीच्या डोक्यात कुदळ घालून तिला मारून टाकले, नंतर मुलाला झाडाला फासावर लटकावून त्याचीही हत्या केली. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली. आरोपीने हत्या केल्याची कबुली दिली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील दिघी येथे ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बलराज कुदळे हा श्रीरामपूर शहरानजीक गोंधवणी येथे राहत होता. त्याचे किरकोळ कारणावरून पत्नी अक्षदा कुदळे हिच्याशी नेहमी वाद व्हायचे, नेहमीच्या कटकटीला कंटाळून त्याची पत्नी अक्षदा काही दिवसांपूर्वी माहेरी निघून गेली होती. मात्र, आरोपी पत्नीला पुन्हा घेऊन आला. आरोपीचे आई वडिलांशी देखील नेहमी वाद होत होते. त्यामुळे तो पत्नी आणि मुलाला घेऊन दिघी-खैरीनिमगाव शिवारात असलेल्या आपल्या शेतावर राहत होता.
काल (१० एप्रिल) रोजी सकाळी बलराजचे पुन्हा किरकोळ पैशाच्या कारणावरून पत्नीशी वाद झाले. त्यानंतर त्याने पत्नी अक्षदा कुदळे आणि पाच वर्षीय मुलगा शिवतेज यांची निर्दयी हत्या केली. त्याने अक्षदा काम करत असताना तिच्या डोक्यात कुदळ घातली, त्यात ती जागीच ठार झाली. यानंतर त्याने पाच वर्षांचा मुलगा शिवतेज याला शेतातील आंब्याच्या झाडाला लटकवून फाशी देत अमानुषपणे मारून टाकले. मुलाचा जीव जाईपर्यंत तो तेथेच थांबला. आरोपीने या दोन्ही घटनांचे व्हिडिओ आणि फोटो काढून स्वतःच्या व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवले होते.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अक्षदा कुदळे ही रक्ताच्या थारोळ्यात तर शिवतेज झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. दोन्ही मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. पोलिसांनी आरोपी बलराज कुदळे याला दिघी येथून ताब्यात घेतले आहे.




