Guardian Minister Chandrakant Patil visits Sangli flood-affected areas to oversee relief measures and inspect damage, 2025.
सांगली, दि. 23 : पूरस्थितीत बाधित झालेल्या नागरिकांच्या पाठीशी शासन व प्रशासन ठामपणे उभे आहे. त्यांना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात. तसेच, शेतातील पाणी ओसरताच नुकसानीचे पंचनामे त्वरित करावेत, असे स्पष्ट निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
पालकमंत्र्यांनी शनिवारी वाळवा तालुक्यातील जुने खेड, औदुंबर येथील दत्तमंदिर परिसर, मौलानानगर, पलूस तालुक्यातील भिलवडी तसेच सांगली महापालिका क्षेत्रातील सूर्यवंशी प्लॉट येथे पूरस्थितीची पाहणी केली. त्यांनी नागरिकांशी संवाद साधत प्रशासनाने दिलेल्या सोयीसुविधांचा आढावा घेतला. यावेळी सांगलीतील सेकंडरी हायस्कूल, सहकार भवन व मार्केट यार्डमधील निवारा केंद्रांना भेट देऊन तेथील व्यवस्थेची तपासणी केली.
पूरग्रस्तांशी संवाद साधताना पाटील म्हणाले, “नैसर्गिक आपत्तीचे आव्हान पेलताना नागरिकांनी भविष्यकालीन संकटे ओळखून तयारी ठेवली पाहिजे. पुरप्रवण गावात पाण्याची सर्वोच्च पातळी रंगाने दर्शवावी, जेणेकरून नागरिकांना वेळीच स्थलांतर करता येईल. रोगराई टाळण्यासाठी तातडीने साफसफाई व औषधफवारणी करावी. नुकसानीचे पंचनामे वेळेत होऊन बाधितांना मदत मिळावी यासाठी प्रशासनाने काटेकोर पावले उचलावीत.”
पूरस्थितीत त्यांनी स्वतः पूरग्रस्तांबरोबर भोजन करून अन्नाचा दर्जाही तपासला. 2019 आणि 2021 च्या महापुराचा संदर्भ देत त्यांनी कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी पर्याय सुचवले. “वारंवार पूरग्रस्त होणाऱ्या ठिकाणी रिकामी जागा ठेवून पहिल्या मजल्यापासून बांधकाम करण्याचा विचार केला पाहिजे,” असेही ते म्हणाले.
अतिवृष्टीमुळे जीवितहानी व जनावरांचे नुकसान झाले नसल्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे कौतुक केले. “सांगली जिल्ह्यातील प्रशासकीय समन्वय उत्तम असल्याने पूरस्थितीत निवारा केंद्रातील जेवण, आरोग्यसुविधा यशस्वीपणे पार पडल्या,” असे त्यांनी सांगितले.
अलमट्टी धरणाच्या उंची वाढीच्या प्रस्तावावर भाष्य करताना पाटील म्हणाले, “कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बॅकवॉटरचा फटका बसू नये म्हणून महाराष्ट्र शासनाने स्पष्ट भूमिका घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयात सरकारची मांडणी भक्कमपणे करण्यात येत असून, अलमट्टीची उंची वाढवू देणार नाही, याची नागरिकांनी खात्री बाळगावी,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
या पाहणी दौऱ्यात आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी अशोक काकडे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, जिल्हा परिषदेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, रणजीत भोसले, उत्तम दिघे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…
मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता केवळ प्रवाशांची नव्हे, तर महसूलवाढीलाही वेग देणार आहे.…
मुंबई : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य…
नवी दिल्ली : नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026’ मध्ये…
मुंबई : महिलांवरील अत्याचार, छळ आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी अस्तित्वात असलेले कायदे अधिक…