Supreme Court grants bail to Arnav Goswami
मुंबई : कथित टीआरपी घोटाळा प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांना चौकशीसाठी बोलवायचे झाल्यास आगाऊ तीन दिवसांची (सुट्यांचे दिवस वगळून) स्पष्ट नोटीस द्यावी. तसेच त्यांच्यावर अटकेची कारवाई करायची झाल्यास आगाऊ ७२ तासांची स्पष्ट नोटीस द्यावी, जेणेकरून त्यांना योग्य न्यायालयासमोर दाद मागता येईल, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी मुंबई पोलिसांना दिला. त्यामुळे गोस्वामींना दिलासा मिळाला आहे.
कथित टीआरपी घोटाळ्यात आम्हाला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशा विनंतीच्या याचिका गोस्वामी आणि रिपब्लिक वृत्तवाहिन्यांची मालक कंपनी एआरजी आऊटलायर मीडियाने केल्या आहेत. त्याविषयी अनेक दिवस सुनावणी घेतल्यानंतर न्या. संभाजी शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठाने बुधवारी हा अंतरिम आदेश दिला.
पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपपत्र दाखल करूनही त्यात गोस्वामी किंवा एआरजीच्या कर्मचाऱ्यांना आरोपी म्हणून दाखवलेलेच नाही. केवळ संशयित दाखवले आहे. अशाप्रकारे पोलिस सातत्याने कारवाईची टांगती तलवार ठेवत आहेत. गोस्वामी यांना यापूर्वी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट असूनही न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून परवानगी न घेताच अटकेची कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणातही तशीच कुहेतूने कारवाई केली जाऊ शकते, असा युक्तिवाद याचिकादारांतर्फे ज्येष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी मांडला होता. तर ‘गोस्वामी स्वत:साठी विशेष दर्जा असल्याचा दावा करू शकत नाहीत. त्यांनाही चौकशीचा सामना करावा लागेल आणि आवश्यकता भासल्यास अटक करायची की नाही हे तपास अधिकारीच ठरवू शकतो, असे म्हणणे मुख्य सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी मांडले होते. अखेरीस ‘याचिकादारांचे आरोपी म्हणून नावच नसताना त्यांच्या डोक्यावर अमर्यादित कालावधीसाठी टांगती तलवार ठेवली जाऊ शकते का?’, असे विविध प्रश्न खंडपीठाने उपस्थित केले. तसेच याचिकादारांविरोधातील तपास किती दिवसांत पूर्ण करणार? अशी विचारणाही केली होती. त्यानुसार, १२ आठवड्यांत तपास पूर्ण केला जाईल, असे ठाकरे यांनी बुधवारी पोलिसांतर्फे सांगितले. त्या पार्श्वभूमीवर, ‘पोलिसांकडून कुहेतूने कारवाई होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. केवळ ते लक्षात घेऊन आगाऊ नोटीसचा अंतरिम आदेश देत आहोत’, असे खंडपीठाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आणि याचिकांवरील पुढील सुनावणी २८ जूनला ठेवली.
न्यायालयाचे अन्य निर्देश
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…