नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. रंभाबाई आनंदा काळे (वय ६०) असे मृत महिलेचे नाव असून त्या निफाड येथील एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत होत्या.
रंभाबाई काळे या निफाडमधील मामलेदार चौक परिसरात वास्तव्यास होत्या. त्या अचानक बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा भाचा प्रवीण घायाळ यांनी २४ फेब्रुवारी रोजी निफाड पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. तक्रार मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचा वापर करत रंभाबाई यांच्या मोबाईलचा सीडीआर (Call Detail Record) तपासला. त्यामध्ये काही संशयास्पद क्रमांक समोर आल्यानंतर पोलिसांनी निफाड येथील अरुण बाजीराव ढेपले (वय ४०) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
प्राथमिक चौकशीदरम्यान अरुण ढेपले याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्याला सोडून देण्यात आले. मात्र, प्रकरण गंभीर होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला तातडीने निफाडमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
उपचारादरम्यान अरुण ढेपले याने पोलिसांसमोर धक्कादायक कबुली दिली. त्याने रंभाबाई काळे यांचा खून करून निफाडजवळील जुना देवपूर रस्त्यालगत असलेल्या विहिरीत मृतदेह फेकल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी शोधमोहीम राबवली असता विहिरीत महिलेचा मृतदेह आढळून आला.
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अरुण ढेपले हा दूध विक्रीचा व्यवसाय करतो. दूध देण्याच्या निमित्ताने त्याची आणि रंभाबाई काळे यांची ओळख झाली होती. पुढे दोघांमध्ये पैशांच्या व्यवहारावरून वाद निर्माण झाला. या वादातूनच त्याने रंभाबाई यांची हत्या केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला असून या प्रकरणाचा अधिक तपास निफाड पोलीस करत आहेत.
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या…
मुंबई : राज्यात आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…
मुंबई : मुंबई उपनगर जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची त्रैमासिक आढावा बैठक उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन)…
मुंबई : मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग हा महाराष्ट्राच्या प्रगतीचा कणा मानला जातो. राज्यातील औद्योगिक, आर्थिक आणि…
मुंबई : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यातील आरोग्य सेवेला बळकटी देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेत, सात…
मुंबई : ज्या शेतकरी बांधव-भगिनींनी अद्याप आपला फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी तत्काळ नोंदणी करून…