अहिल्यानगर

शिर्डी-अहमदनगरच्या विकासात समृद्धी आणणारा महामार्ग!

अहमदनगर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी असा ५२० किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यातील वाहतूक-दळणवळण सेवेचे ११ डिसेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे. समृद्धी महामार्गाची अहमदनगर जिल्ह्यातील लांबी २९.४० किलोमीटर असून कोपरगाव इंटरचेंज पासून शिर्डी १० किलोमीटर आहे. अहमदनगर मुख्यालयाचे अंतर ११० किलोमीटर आहे. समृद्धी महामार्गालगत जिल्ह्यात २ कृषी समृद्धी उभारण्यात येणार आहेत. यामुळे शिर्डी व अहमदनगर परिसरातील कृषी, उद्योग व व्यवसायाला चालना मिळून रोजगार वाढणार आहे. समृद्धी महामार्गामुळे शिर्डीत देशविदेशातून येणाऱ्या भाविकांची संख्याही वाढणार आहे. शिर्डी व परिसराच्या विकासाला चालना मिळणार आहे.

राज्याच्या दरडोई उत्पन्नात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर यासारख्या मोजक्या शहरांचा हातभार लाभला आहे. अहमदनगर जिल्हा साखरेचे कोठार आहे. कृषिदृष्टया संपन्न जिल्हा आहे. दळण-वळण साधनांअभावी जिल्ह्यातील काही भाग विकासापासून मागे राहिले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर समृद्धी महामार्ग शिर्डी परिसर व अहमदनगर जिल्ह्याच्या विकासाचा महामार्ग ठरणार आहे.

अहमदनगर १० जिल्ह्यांशी प्रत्यक्ष व १४ जिल्ह्यांशी अप्रत्यक्ष जोडले जाणार
समृद्धी महामार्गात अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्‍यातील १० गावे येतात. जिल्ह्यातील या रस्त्याची लांबी धोत्रे ते दर्डे कोऱ्हाळे ( २९.४० किमी ) इतकी तर रुंदी १२० मीटर इतकी आहे. समृध्दी द्रुतगती मार्गाचा डिझाइन स्पीड १५० कि.मी. / प्रति तास आहे. या द्रुतगती मार्गावरून १०० कि.मी. / प्रतितास वेगाने वाहने गेल्यावर मुंबईपासून शिर्डी येण्यास अवघे दोन तास लागतील. नागपूरहून शिर्डी येण्यास अवद्ये ५ तास लागतील. समृध्दी महामार्गाला अहमदनगरशी जोडणारा मनमाड-नगर रस्त्याच्या कामास जानेवारी २०२३ पासून सुरूवात होत आहे. हा रस्ता डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे जिल्ह्याचा समृध्दी महामागापर्यंत पोहचण्यासाठी वेगवान संपर्क उपलब्ध असणार आहे. त्यामुळे साहजिकच औद्योगिक तसेच कृषी मालाची वाहतूक विनाअडथळा आणि वेगवान पद्धतीने होऊ शकणार आहे. महाराष्ट्र समृद्धी महामार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या दहा जिल्ह्यांमधून जाणार आहे. तर इंटरचेंजेसच्या माध्यमातून १४ जिल्हे समृद्धी महामार्गाशी अप्रत्यक्षपणे जोडले जाणार आहेत. त्यामुळे राज्यातील ३६ पैकी २४ जिल्ह्यांना समृद्धी महामार्गाचा लाभ होणार आहे, हे विशेष. यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील साखर कारखाने, कृषी उद्योग, दूध व्यवसाय, भाजीपाला, फळे-फुले पिकविणारे शेतकरी व व्यावसायिकांना महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विशेष लाभ होणार आहे.

पर्यटनवाढीलाही चालना, कृषी समृद्धी केंद्रे आणि रोजगार
समृध्दी महामार्गामुळे शिर्डी, शनि शिंगणापूर, ज्ञानेश्वर मंदीर (नेवासा),देवगड आदी पर्यटन स्थळे इतर जिल्ह्यांच्या नजीक येणार आहेत. शिर्डीत येणाऱ्या भाविकांच्या दृष्टीने ही रस्ता वरदान ठरणार आहे. त्यामुळे सहाजिकच शिर्डीतील भाविकांची संख्या वाढून रोजगाराला चालना मिळणार आहे. कोपरगांव तालुक्यातील धोत्रे व राहाता तालुक्यातील सावळीविहिर येथे कृषी समृद्धी केंद्रांची निर्मिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे केली जाणार आहे. सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्रावर विकसित केले जाणारे प्रत्येक कृषी समृद्धी केंद्र स्वयंपूर्ण नवनगर असेल. नियोजनबद्ध विकास हे या नवनगरांचे वैशिष्ट्य असेल. या नवनगरांमध्ये शेतीला पूरक उद्योग असतील, तसेच औद्योगिक उत्पादनासाठी काही भूखंड राखीव असतील. शाळा, महाविद्यालये, रुग्णालय, मोकळे रस्ते, निवासी इमारती, इत्यादी सुविधा या नवनगरांमध्ये असतील एका कृषी समृद्धी केंद्रात ३० हजार थेट तर ६० हजार अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण होणार आहेत. त्यामुळे नवनगरांच्या माध्यमातून भविष्यात १५ ते २० लाख नवीन रोजगारांची संधी निर्माण होणार आहे.

सीएनजीचा विनाअडथळा पुरवठा
शिर्डी व अहमदनगर जिल्ह्याला सीएनजीचा टँकरद्वारे पुरवठा होत असतो. त्यामुळे जिल्ह्यात मोजक्याच पंपावर तास व दीड तासासाठी सीएनजी उपलब्ध होते. समृद्धी महामार्गालगत गॅस अथॉरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून सीएनजी गॅस पाईपलाईन टाकण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्याला चोवीस तास पर्यायी नैसर्गिक इंधन उपलब्ध होणार आहे.

समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्ये

  • लांबी ७०१ किमी
  • एकूण जमीन : ८३११ हेक्टर
  • रुंदी : १२० मीटर
  • इंटरवेज : २४
  • अंडरपासेस : ७००
  • उड्डाणपूल : ६५
  • लहान पूल : २९४
  • वे साईड अमॅनेटीझ : ३२
  • रेल्वे ओव्हरब्रीज : ८
  • द्रुतगती मार्गावरील वाहनांची वेगमर्यादा ताशी : १५० किमी (डिझाइन स्पीड)
  • द्रुतगती मार्गाच्या दुतर्फा झाडांची संख्या : साडे बारा लक्ष
  • कृषी समृद्धी केंद्रे : १८ एकूण गावांची संख्या : ३९२
  • प्रकल्पाचा अंदाजित खर्च: ५५ हजार कोटी रुपये
  • एकूण लाभार्थी : २३ हजार ५००
  • वितरित झालेला मोबदला : ६ हजार ६०० कोटी रुपये
  • कौशल्य विकास प्रशिक्षणाचे लाभार्थी : ३५६
  • द्रुतगती मार्गालगत सीएनजी/ पीएनजी गॅस वाहिनी : गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया मार्फत
  • ऑप्टिकल फायबर नेटवर्कचे जाळे

येत्या दशकात महाराष्ट्राचे आर्थिक चित्र बदलण्याचे सामर्थ्य असलेला हा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्याच्या समृद्धतेचे प्रतीक ठरेल, यात शंका नाही.
संकलन – उप माहिती कार्यालय, शिर्डी

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago