आयपीएल मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ आपली पराभवांची मालिका खंडीत करण्यात यशस्वी ठरला आहे. सलामीवीर मयांक अग्रवाल, कर्णधार लोकेश राहुल आणि ख्रिस गेल यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर पंजाबने RCB वर ८ गडी राखून मात केली आहे. तेराव्या हंगामात आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या गेलने अर्धशतक झळकावलं. कर्णधार लोकेश राहुलनेही नाबाद अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
नाणेफेक जिंकून RCB चा कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. देवदत पडीकल आणि फिंच या सलामीच्या जोडीने RCB च्या संघाला आश्वासक सुरुवात करुन दिली. दोन्ही फलंदाजांमध्ये ३८ धावांची भागीदारी झाल्यानंतर अर्शदीप सिंहने देवदत पडीकलला माघारी धाडलं. त्याने १८ धावा केल्या. मुरगन आश्विनने फिंचला त्रिफळा उडवत बाद केलं. चौथ्या क्रमांकावर RCB ने वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली. विराट कोहली संघाची बाजू सावरण्याचा प्रयत्न करत असताना वॉशिंग्टन सुंदर आश्विनच्या गोलंदाजीवर माघारी परतला.
शिवम दुबेने मैदानावर येऊन विराट कोहलीच्या साथीने संघाचा डाव सावरत १०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. १६ व्या षटकाच्या अखेरीस शिवम दुबेही माघारी परतला. १६ व्या षटकापर्यंत RCB ने फक्त १२७ धावांपर्यंत मजल मारली होती. डिव्हीलियर्सला अखेरच्या षटकांत फटकेबाजी करण्यासाठी राखून ठेवण्याचा RCB चा प्लान फसला. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर १८ व्या षटकात मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात डिव्हीलियर्स दोन धावा काढून माघारी परतला. कोहलीही शमीच्या स्लो बाऊन्सरवर फटका खेळण्याच्या प्रयत्नात यष्टीरक्षक लोकेश राहुलकडे झेल देऊन माघारी परतला. त्याने ३९ चेंडूत ४८ धावांची खेळी केली. अखेरच्या षटकात ख्रिस मॉरिसने फटकेबाजी करत RCB ला १७१ धावांचा पल्ला गाठून दिला.पंजाबकडून मोहम्मद शमी आणि मुरगन आश्विनने प्रत्येकी २ तर अर्शदीप सिंह आणि ख्रिस जॉर्डनने १-१ बळी घेतला.
RCB ने विजयासाठी दिलेल्या १७२ धावांचा पाठलाग करताना किंग्ज इलेव्हन पंजाबने आक्रमक सुरुवात केली. कर्णधार लोकेश राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी अर्धशतकी भागीदारी करत पंजाबला भक्कम सुरुवात करुन दिली. युजवेंद्र चहलने मयांकला बाद करत बंगळुरुला पहिलं यश मिळवून दिलं. मयांकने २५ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह धडाकेबाज ४५ धावा केल्या. मयांक माघारी परतल्यानंतर ख्रिस गेल मैदानावर आला. यानंतर ख्रिस गेलनेही बंगळुरुच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. शारजाच्या छोट्या मैदानाचा फायदा घेत गेलनेही फटकेबाजी करत ५३ धावांची खेळी केली. लोकेश राहुलने नाबाद ६१ धावांची खेळी केली. शेवटच्या चेंडूवर विजयासाठी एक धाव हवी असताना निकोलस पूरनने षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला.




