AUS vs IND : पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला ६६ धावांनी पराभव पत्करावा लागला. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या पहिल्या वन डे मॅचमध्ये टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाने ५० ओव्हरमध्ये ६ बाद ३७४ धावा केल्या. भारताची सुरुवात आश्वासक झाली नाही. शिखर धवन आणि हार्दिक पंड्या यांनी भागीदारी करत डाव सावरला परंतु त्यांचे प्रयत्न संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.
India Vs Australia 1st ODI : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलं 375 धावांचं लक्ष्य
जोश हेझलवूडने भारताला सुरुवातीला तीन धक्के दिले. हेझलवूडने पहिल्यांदा सलामीवीर मयांक अगरवालला २२ धावांवर असताना बाद केले. त्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली हेझलवूडच्या उसळत्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. हेझलवूडच्या याच षटकातील पाचव्या चेंडूवर श्रेयस अय्यरने २ धावा करत आपली विकेट गमावली. लोकेश राहुलही १२ धावा करून बाद झाला. भारताची १४व्या षटकात ४ बाद १०१ अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर सलामीवीर शिखर धवन आणि हार्दिक पंड्या यांनी चांगली भागीदारी केली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी १२८ धावांची महत्वाची भागीदारी रचली. पण ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झॅम्पाने धवनला बाद केले. धवनने १० चौकारांच्या मदतीने ७४ धावा केल्या. धवन बाद झाल्यावर काही वेळातच हार्दिकही बाद झाला. पंड्याने ७६ चेंडूंत सात चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ९० धावांची खेळी केली.