बिहार विधानसभा निवडणुकांची मतमोजणी चालू असताना निवडणूक आयोगाने सांगितले आहे की ही मोजणी रात्री उशिरापर्यंत चालू राहणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे २०१५च्या निवडणुकीच्या तुलनेत ६३% अधिक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे लावली असल्याने हा विलंब होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत सांगितले, कोव्हिड-19च्या संकटामुळे मतदान केंद्रांची संख्या जवळपास ६३% नी वाढवण्यात आली होती आणि प्रत्येक केंद्रावरील मतदारांची संख्या १,५००वरून १,००० करण्यात आली होती. मतमोजणीच्या फेऱ्या या मतदान केंद्रांच्या संख्येवर अवलंबून असतात. मतमोजणी चालू झाल्यानंतर सर्व गोष्टी बदलतात. त्यामुळे एकूण आकडा सांगणे शक्य नसते.
त्यांनी सांगितले की साधारण ३.१ कोटी मतांची मोजणी होणे अद्याप बाकी आहे. कायद्यानुसार आज सकाळी ८ वाजेपर्यंत पोहोचलेली टपाली मते मोजणीसाठी घेतली जातात. त्याचप्रमाणे इथेही ती घेतली जातील. यासंबंधीची सर्व माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडे उपलब्ध असेल.
बिहारमध्ये सत्तेवर असलेली रालोआ विरोधकांच्या तुलनेत राज्यातील एकूण २४३ जागांपैकी अर्ध्याहून अधिक जागांवर पुढे आहे आणि भाजपा त्यांचा मित्रपक्ष संयुक्त जनता दलपेक्षा पुढे जाताना दिसत आहे.