भागलपूर : बिहारमध्ये १०० लोकांना घेऊन जाणारी बोट थेट नदीत पलटल्याने ५ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काही वेळापूर्वीच समोर आली आहे. तसेच अनेक जण अजूनही बेपत्ताच असल्याचं समजतं आहे. बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध सुरू आहे. बोटीच्या क्षमतेपेक्षा जास्त लोकं भरल्याने ही बोट पलटी झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची टीम देखील घटनास्थळी दाखल झाली आहे. स्थानिक प्रशासन घटनास्थळी आहे आणि बचावकार्य सुरू आहे. दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती सध्या व्यक्त केली जात आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बोटीच्या क्षमतेपेक्षा जास्त लोकं भरल्याने ही बोट पलटी झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुरुवातीला बोट नदीच्या जोरदार प्रवाहात अडकली आणि मग अचानक पलटी झाली. यावेळी बोटीत अनेक महिला देखील होत्या. यावेळी, आसपासच्या लोकांनी काही प्रमाणात तात्काळ मदत करत काही जणांना बाहेर काढून त्यांचे जीव वाचवले. दरम्यान, काहींची प्रकृती चिंताजनक असून त्यांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या अपघातग्रस्त बोटीमध्ये काही कामगार, शेतकरी, महिला आणि मुलं हे बसले होते. जे आपल्या शेतात काम करण्यासाठी गंगा नदीच्या पलीकडे जात होते.