शिर्डी : सौर ऊर्जा पर्यावरणपूरक आहे. त्यामधून हानिकारक कार्बन डाय ऑक्साईड वायूचे उत्सर्जन होत नाही. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत नाही तसेच सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतीला दिवसा वीज पुरवठा करता येत असल्याने सौर ऊर्जेला प्राधान्य देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राहूरी येथे केले.
एकात्मिक ऊर्जा विकास-1 अंतर्गत राहूरी खुर्द येथील 33/11 उपकेंद्र येथील पाच एमव्हीए ट्रान्सफॉर्मरचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले, मागील काळात कोरोना प्रादुर्भावामुळे विकास कामे थांबली होती. शासनाने कोरोना नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना राबविल्या. गोरगरिबांना मोफत धान्य पुरवठा केला, आरोग्य सेवा दिली. जनतेच्या आरोग्य सेवेला सर्वोच्च प्राधान्य दिले. लॉकडाऊनमुळे शासनाला अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. केंद्र शासनाकडून अद्यापही राज्याच्या वाट्याचे जीएसटीचे सुमारे पंचवीस हजार कोटी रुपये येणे बाकी आहे. तरीही जिल्ह्याच्या विकास योजनेमध्ये कोणतीही कपात केलेली नाही. आमदारांना त्यांचा स्थानिक विकास निधी उपलब्ध करून दिला.
ऊर्जा राज्यमंत्री राहूरी परिसराचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे येथील विकास कामांना निधी अपुरा पडणार नाही, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले. शेतकरी जगाचा पोशिंदा असल्याने त्याची काळजी महाविकास आघाडी शासन घेत असल्याची माहिती त्यांनी दिली. शेतीच्या थकीत वीज बीलासाठी सवलत योजना शासनाने जाहीर केली आहे. राज्यातील 44 लाख शेती पंप ग्राहकांची सुमारे 45 हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. शासनाने शेती पंपाच्या बिलांवर सवलतीची योजना जाहीर केली आहे. शेतकऱ्यांनी शेती पंपाचे सवलतीच्या दरातील वीज बिल भरण्यासाठी पुढाकार घेण्याचे व शासनास सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सौर ऊर्जा प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या तीन एचपी क्षमतेच्या मोटारी चालणे शक्य होणार आहे. मात्र सौर ऊर्जा प्रकल्पाच्या आजूबाजूला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची स्थानिकांनी काळजी घ्यावी. वांबोरी चारी प्रकल्प, ग्रामीण रुग्णालयासाठी इमारत बाधणे, राहूरी बसस्थानक नुतनीकरणाच्या बांधकामासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी त्यांच्या भाषणात राहूरी परिसरातील नियोजित ऊर्जा प्रकल्पांची माहिती दिली. यामुळे शेतीला वीजेचा तुटवडा भासणार नाही असे सांगितले. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी जमीन उपलब्ध करून देणाऱ्या शेतकऱ्यांना महामंडळाकडून भाडे अदा करण्यात येणार असल्याची माहिती दिली. शेती पंपाच्या थकीत बिलावरील दंड माफ करुन व्याजात सवलत देण्यात आली असल्याने वीज देयक भरण्याचे त्यांनी आवाहन केले.
अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…
मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…
सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…
ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…
मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया…