राज्यातील मंदिरे उघडण्याबाबत राज्य सरकारनं निर्णय न घेतल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं नाराजी व्यक्त केली आहे. लॉकडाऊन टप्प्याटप्प्यानं उठवताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचा आधार घेत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ट्विट करत म्हटलं आहे कि, ‘पुनश्च हरी ॐ म्हणता व ‘हरी’ला च कोंडून ठेवता’.
कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊन नंतर ‘अनलॉक’चा सध्या पाचवा टप्पा सुरू आहे. शाळा, लोकल आणि मंदिरे वगळता जवळपास सर्वच गोष्टींना सरकारनं परवानगी दिली आहे. मात्र, प्रार्थनास्थळे उघडण्याबाबत सरकारनं निर्णय घेतलेला नाही. मनसेनंही या संदर्भात मागणी केली आहे. मात्र, राज्य सरकारनं अद्याप या मागणीची दखल घेतलेली नाही.
बाळा नांदगावकर यांनी ट्वीट करून याबाबतीत संताप व्यक्त केला आहे. ‘आधी बार उघडण्याचा निर्णय सरकारनं घेतला. नंतर बारची वेळ देखील वाढवून दिली. आता जलतरण तलाव, मल्टिप्लेक्सला परवानगी देण्यात आली. मग कोरोना फक्त मंदिरातच होईल का? काय तर्क (Logic) असावा यामागे हे कोडेच आहे,’ असं नांदगावकर यांनी म्हटलं. तसेच ‘हा केवळ भावनेचा प्रश्न नाही तर तेथील संबधित हजारो व्यावसायिकांच्या उपजीविकेचा व रोजगाराचा देखील प्रश्न आहे,’ असंही त्यांनी निदर्शनास आणलं आहे.
तेथील संबधित हजारो व्यावसायिकांच्या उपजीविकेचा व रोजगाराचा देखील प्रश्न आहे.@CMOMaharashtra ,@mnsadhikrut ,@abpmajhatv ,@News18lokmat ,@zee24taasnews ,@TV9Marathi
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) November 6, 2020




