राज्यातील महाविकास आघाडी सरकार म्हाताऱ्या बैलासारखे आहे. या सरकारला तुतारी घेऊन सतत टोचत राहावे लागते. त्याशिवाय ते पुढेच जात नाही, अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी नागपुरात केली. नागपूर पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ पूर्व विदर्भाच्या पदवीधरांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
नितीन गडकरी यावेळी म्हणाले, नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाची निविदा काढण्यात आली. मात्र सरकार बदलले आणि काम ठप्प झाले. नागपूर ब्रॉड गेज मेट्रोला मंजुरी देण्यासाठी या सरकारला एक वर्ष लागलं. भाजपचे सरकार असते तर एक महिन्यात झाले असते.
निवडणुकीत जातीपातीचे राजकारण केले जात आहे. माणूस हा जातीने नाही तर कर्तृत्वाने मोठा असतो. विविध पक्षांमध्ये ज्या जातीनिहाय आघाडी करण्यात आल्या आहेत त्या बंद झाल्या पाहिजे. कार्यकर्त्यांत जात नसते. मात्र ज्याला उमेदवारी पाहिजे असते त्यांना जात आठवते. परंतु राज्यातील आघाडी सरकार व केंद्रातील विरोधक जातीचे राजकारण करीत आहेत. त्यांना धडा शिकवायला हवा, असंदेखील गडकरी म्हणाले.