अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उर्मिला यांनी जाहीर पत्रकार परिषद घेत पक्ष प्रवेशाच्या निर्णयाबाबत खुलासा केला.
‘शिवसेनेत प्रवेश करण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फोन केला होता. त्यावेळी त्यांनी अतिशय सुंदर गोष्ट सांगितली, ती म्हणजे ‘महाराष्ट्राची परंपरा इतकी मोठी आहे की त्यामुळं विधान परिषदेचा सांस्कृतिक आणि सामाजिक दर्जा वाढावा अशी माझी मनोमन इच्छा आहे. या जागा आणि भवनापर्यंत जाण्यासाठी लोकांना खूप मोठा प्रवास करावा लागतो. त्यामुळं याचा दर्जा कुठेतरी वाढवला गेला पाहिजे. त्याकरता तुमच्या सारख्या लोकांची गरज आहे,’ असं उर्मिला यांनी सांगितलं.
‘उद्धव ठाकरेंचे हे विचार मला त्यावेळी पटले. विधान परिषदेसारख्या जागांवर महाराष्ट्र राज्य सगळ्यात पुढे आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझा विचार केला त्यामुळं मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. राज्यपाल नियुक्त जागासाठी माझं नाव सुचवलं आहे. पण मी शिवसैनिक म्हणूनच काम करणार. मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. माझ्यावर पक्षात प्रवेश करण्याचा कोणताही दबाव नव्हता पण मला काम करण्याची इच्छा असल्यानं मी आज पक्ष प्रवेश केला,’ असं उर्मिला यांनी स्पष्ट केलं.
‘करोना संकटाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलं आहे. कुटुंबप्रमुखाप्रमाणे ते सगळ्यांना समजावत आहेत त्यांच्या या कामामुळं मी प्रभावीत झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची माझी इच्छा आहे,’ असंही त्या म्हणाल्या आहेत. तसंच, महाविकास आघाडी सरकारने वाखणण्याजोगे काम केलं आहे,’ असं देखील त्या यावेळी म्हणाल्या.