अलिबाग : रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अलिबाग न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अर्णव गोस्वामी यांना पोलीस कोठडी देण्याची ठाकरे सरकारची मागणी न्यायालयाने फेटाळली. अर्णव गोस्वामी यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. उद्या मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली जाईल. अर्णव गोस्वामी यांना न्याय नक्की मिळेल, असा विश्वास किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणातील अन्य आरोपी फिरोज शेख आणि नितेश सारडा यांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अर्णव गोस्वामी यांना आज सकाळी मुंबई आणि रायगड पोलिसांच्या संयुक्त पथकाने अटक केली होती. यानंतर अर्णव गोस्वामी यांना अलिबाग येथे आणून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हापासून अर्णव यांच्या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. यादरम्यान अर्णव गोस्वामी यांना रुग्णालयात नेऊन त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. त्यामुळे आता उद्या अर्णव गोस्वामी यांना जामीन मिळवून देण्यासाठी काय हालचाली व कायदेशीर डावपेच पाहायला मिळणार, याविषयीची उत्सुकता वाढली आहे.
दुपारच्या सत्रात अलिबाग पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचे अर्णव गोस्वामीयांनी आरोप केले होते. यावेळी त्यांनी माझ्या हाताला आणि पाठीला दुखापत झाल्याचेही अर्णव गोस्वामी यांनी म्हटले होते. मात्र, न्यायालयाने व्हिडीओ क्लीप आणि वैद्यकीय चाचणीचा अहवाल ग्राह्य धरत अर्णव गोस्वामी यांचे हे आरोप फेटाळून लावले. पोलिसांकडून अर्णव गोस्वामी यांची पत्नी आणि मुलाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याचा या दोघांवर आरोप ठेवण्यात आला आहे. आज सकाळी रायगड पोलिसांची टीम अर्णवच्या घरी त्याला अटक करण्यासाठी आली होती. त्यावेळी अर्णवला अटक करत असताना त्याची पत्नी आणि मुलाने पोलिसांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्याला घेऊन जाऊ देत नव्हते. अर्णवला घेऊन जाण्यास त्यांनी मज्जाव केल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.