चीन आता निसर्गाशी पंगा घेण्याची तयारी करत आहे. चीनने आता प्रायोगिक हवामान बदल कार्यक्रमाच्या (weather modification programme) विस्तृत विस्ताराची घोषणा केली आहे. या अंतर्गत चीन 5 दशलक्ष चौरस किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्र कव्हर करणार असून हे क्षेत्र भारताच्या दीडपट इतकं विस्तृत आहे. चीनचा असा दावा आहे की येत्या पाच वर्षांत तो इतक्या मोठ्या भागात कृत्रिम पाऊस आणि गारांचा पाऊस करण्याचं तंत्रज्ञान मिळवेल आणि त्याबरोबर हिमवृष्टी रोखण्यातही यशस्वी होईल.
चीनने यापूर्वीदेखील अशा गोष्टी केल्या असून २००8 च्या बीजिंग ऑलिम्पिकपूर्वी चीनने धुक्यापासून मुक्त होण्यासाठी क्लाऊड सीडिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने कृत्रिम पाऊस पाडला होता जेणेकरून ऑलिम्पिकदरम्यान धुक्यापासून मुक्ती मिळेल आणि पाऊस मध्ये व्यत्यय आणणार नाही. २०१२ ते 2017 दरम्यान चीनने हवामान बदलांच्या विविध कार्यक्रमांवर १.34 अब्ज डॉलर्स (98.81 अब्ज रुपये) खर्च केले आहेत. गेल्या वर्षी चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने सांगितलं होत कि, हवामान बदलणार्या तंत्रज्ञानामुळे उत्तर शिनजियांगमधील गारपिटीमुळे होणारे नुकसान 70 टक्क्यांनी कमी झाले आहे. हे क्षेत्र शेतीच्या दृष्टीकोनातून महत्वाचे आहे.
क्लाउड सीडिंग तंत्रज्ञानामधील चीनचा उत्साह भारतासारख्या देशांना सावध करतो, जिथे शेती प्रामुख्याने पावसाळ्यावर अवलंबून असते. हवामान बदलामुळे मान्सूनवरही परिणाम झाला असून त्याचा पूर्वानुमान लावणे पूर्वीपेक्षा अधिक कठीण झाले आहे.
चीनच्या स्टेट कौन्सिलने यापूर्वी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, येत्या पाच वर्षांत 58 लाख चौरस किलोमीटर क्षेत्र हवामान बदल कार्यक्रमांतर्गत येईल. हे आपत्ती व्यवस्थापन, शेती उत्पादन वाढविण्यात, जंगलातील आग रोखण्यास, उच्च तापमान आणि दुष्काळाशी सामना करण्यास मदत करेल.