राज्यातील शाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थिती ५० टक्के करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोरोनामुळे राज्यातील शाळा १५ जून २०२० ला सुरु होऊ शकल्या नाहीत. त्यानंतर १५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरु करुन परिस्थितीनुसार शाळा टप्प्या-टप्प्याने सुरु करण्यात आल्या. त्यासाठीचे निर्णय संबंधित जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांच्या सहमतीने घेतले गेले.
राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत सर्व आस्थापना टप्प्या-टप्प्याने सुरु करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना (SOP) देण्यात आल्या आहेत आता शाळांमधली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती आता ५० टक्के करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राज्यातील शासकीय, खासगी अनुदानित, विनाअनुदानित इत्यादी सर्व प्रकारच्या शिक्षण संस्थामार्फत चालवण्यात येणाऱ्या शाळांमधील ५० टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी ऑनलाइन, ऑफलाइन, दूरस्थ शिक्षण संस्थांशी संबंधित कामांसाठी तातडीने कामावर रुजू व्हावे असे सरकारने म्हटले आहे.